मुंबई : चौफुला-सुपे रस्त्यावर आज सकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसला झालेल्या भीषण अपघाताची राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तात्काळ दखल घेतली आहे. या अपघातात सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शाळेतील 30 ते 40 विद्यार्थी जखमी झाले असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अप्पर पोलीस अधीक्षक आणि मुख्याध्यापकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
आज सकाळी नेहमीप्रमाणे विद्यार्थी एसटी बसने शाळेकडे जात असताना हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ उपचारासाठी पाटस, चौफुला आणि लोणी काळभोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अप्पर पोलीस अधीक्षक आणि विद्या प्रतिष्ठानच्या शाळेतील मुख्याध्यापकांशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. तसेच घटनास्थळी आणि रुग्णालयात आवश्यक ते सर्व मदतकार्य जलद गतीने पुरवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
दरम्यान, जखमी विद्यार्थ्यांवर सध्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पालक आणि नागरिकांनी कोणत्याही प्रकारे घाबरून जाऊ नये, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.