मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस; तब्येत खालावली तरी मागणीवर ठाम, सरकारचे शिष्टमंडळ आज भेटणार - टॉप न्यूज मराठी

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज शनिवारी सहावा दिवस आहे. गेल्या सहा दिवसांपासून अन्न-पाण्याविना उपोषण करत असल्याने त्यांची तब्येत मोठ्या प्रमाणात खालावली आहे. त्यांना अशक्तपणा, चक्कर येणे, रक्तदाब कमी-जास्त होणे आणि पायांमध्ये गोळे येण्याचा त्रास होत आहे. शुक्रवारी रात्री प्रकृती जास्तच बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना पाणी आणि सलाईन लावण्यात आले आहे. सध्या त्यांच्या हाताला सलाईन सुरू असून ते विश्रांती घेत आहेत. मात्र, सलाईन घेतले असले तरी माघार नाही, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.

सरकारचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ आज अंतरवालीत, काय चर्चा होणार ?

जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्यासाठी आज राज्य सरकारचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ अंतरवाली सराटी येथे जाणार आहे. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री मकरंद पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांचा समावेश आहे. काल रात्री उशिरा आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन सरकारने आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली होती. मात्र, जरांगे पाटील आपल्या प्रमुख मागणीवर ठाम आहेत. सातारा आणि कोल्हापूर गॅझेट लागू करण्यासाठी तात्काळ जीआर काढावा, ही त्यांची मुख्य मागणी आहे. हैदराबाद गॅझेटचा विषय न्यायालयात असल्याने सरकार त्यावर थेट निर्णय घेऊ शकत नाही, त्यामुळे आजचे शिष्टमंडळ सातारा आणि कोल्हापूर गॅझेटबाबत काय ठोस आश्वासन देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पहिले उपोषण 29 ऑगस्ट 2023 रोजी अंतरवाली सराटी येथे सुरू केले होते. हे उपोषण तब्बल 17 दिवस चालले आणि 14 सप्टेंबर 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन ते सोडवले होते. यानंतरचा त्यांचा प्रवास 

  • 1 ले उपोषण : 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 (17 दिवस)* - अंतरवाली सराटी. लाठीचार्जनंतर सुरू केलेले ऐतिहासिक उपोषण.
  • 2 रे उपोषण : 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2023 (8 दिवस)* - सरकारने 40 दिवसांचा वेळ मागितला होता, मुदत संपल्याने पुन्हा उपोषण. धनंजय मुंडे, उदय सामंत यांच्या मध्यस्थीने सुटले. 0197
  • 3 रे उपोषण : 20 जानेवारी ते 27 जानेवारी 2024 - मुंबई मोर्चा

याच काळात जरांगे पाटील यांनी अंतरवाली ते मुंबई असा पायी मोर्चा काढला. 20 जानेवारीला सुरू झालेला मोर्चा वाशीमध्ये पोहोचल्यानंतर सरकारने सगे-सोयरे मसुदा अधिसूचना काढली आणि उपोषण सुटले.

  • 4 थे उपोषण : 10 ते 26 फेब्रुवारी 2024 - विधानसभेत 10% मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यावर उपोषण स्थगित.
  • 5 वे उपोषण : 8 जून ते 13 जून 2024 (6 दिवस) - अंतरवाली सराटीत. शंभूराज देसाई, अतुल सावे यांच्या मध्यस्थीने सुटले. 
  • 6 वे उपोषण : 20 ते 24 जुलै 2024 (5 दिवस) - तब्येत खालावल्याने सहकाऱ्यांनी बळजबरीने सलाईन लावली होती. 
  • 7 वे उपोषण : 17 ते 25 सप्टेंबर 2024 (8 दिवस) - सरकारकडून कोणीही न आल्याने गावातील महिलांच्या हातून पाणी पिऊन सोडले.
  • 8 वे उपोषण : 25 ते 30 जानेवारी 2025 (6 दिवस) - जालना जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर सुटले.
  • 9 वे उपोषण : 30 मे 2025 - रखरखत्या उन्हात केलेले उपोषण. 12 मागण्यांवर चर्चा झाली.
  • 10 वे उपोषण : 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2025 - दुसरा मुंबई मोर्चा

आझाद मैदान, मुंबई येथे झालेले हे उपोषण सर्वात गाजले. सरकारने हैदराबाद गॅझेटचा जीआर काढल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातून ज्यूस पिऊन सोडले.

  • 11 वे उपोषण (सध्याचे) : 29 ऑगस्ट 2026 पासून सुरू
  • 29 ऑगस्ट 2023 ला पहिले उपोषण सुरू झाले, त्याला 3 वर्षे पूर्ण होत असताना जरांगे यांनी 11 वे उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा सहावा दिवस असून हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी, सातारा आणि कोल्हापूर गॅझेटचा जीआर या मागण्यांवर ते ठाम आहेत.