मुंबई : मुंबईत माझगाव येथे काल रात्री माझगावचा मोरया गणपती आगमन मिरवणुकीवर अंडी आणि दगडफेक झाल्याचा आरोप झाला आहे. या घटनेवर मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत, “अंडी फेकण्याचे प्रकार होत असतील तर ईद येतेय हे लक्षात ठेवा, मोहरम येईल. हिंदूंनीच कायद्याचा ठेका घेतला नाही,” असा थेट इशारा दिला आहे.
काल मध्यरात्री 1.45 वाजेपर्यंत माझगावात तणाव होता. माझगावचा मोरया मंडळाची आगमन मिरवणूक सुरू असताना कॉनटिनेन्टल हाईट्स टॉवर या इमारतीतून काही लोकांनी मिरवणुकीवर अंडी आणि दगड फेकल्याचा आरोप मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला. यानंतर कार्यकर्त्यांनी घटनास्थळीच ठिय्या देत जोरदार निदर्शने केली. गणेशोत्सव काही दिवसांवर असताना या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.
या घटनेवर बोलताना नितेश राणे म्हणाले, “जर आमच्या गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकणार असाल, तर ईद आणि मोहरम कधी येतेय हे विसरू नका. धर्म रक्षणासाठी आमच्या भगवद् गीतेमध्ये शस्त्र उचलण्याची सुद्धा मुभा दिली आहे. कायदा पाळण्याचा ठेका फक्त हिंदूंनी घेतलेला नाही. अशा जिहादी मानसिकतेला सोडणार नाही.” असा थेट इशारा नितेश राणे यांनी दिला.
या प्रकरणी बायखळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी इमारतीतील CCTV फुटेज ताब्यात घेतले असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, विरोधकांनी नितेश राणे यांच्या वक्तव्यावर टीका करत राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे.