पुणे : “पुणेकरांनो, आपल्या मुलांच्या आणि पुढील पिढ्यांच्या भविष्यासाठी आज आपण पाण्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी, मातीचे संवर्धन करण्यासाठी आणि जलसुरक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘महा पदयात्रेत – पाण्यासाठी’ मोठ्या संख्येने सहभागी व्हा,” असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुणेकरांना केले आहे.
जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने जलसंधारण दिनानिमित्त दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते ९ या वेळेत ‘महा पदयात्रा – पाण्यासाठी’ आयोजित करण्यात आली आहे. पोलिस परेड ग्राउंड, शिवाजीनगर, पुणे येथून पदयात्रेला सुरुवात होणार आहे. ‘माती वाचवा, पाणी वाचवा, भविष्य सुरक्षित करा’ ही या पदयात्रेची संकल्पना असून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश या माध्यमातून देण्यात येणार आहे.
“आज जपलेला पाण्याचा प्रत्येक थेंब हा उद्याच्या पिढीसाठीची आपली मोठी गुंतवणूक आहे. पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून आपल्या जीवनाचा आणि भविष्यातील विकासाचा आधार आहे. त्यामुळे जलसंधारणाची जबाबदारी शासनासोबतच समाजातील प्रत्येक घटकाने स्वीकारणे आवश्यक आहे,” असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले. युवक, विद्यार्थी, महिला, नागरिक, शासकीय अधिकारी-कर्मचारी, सामाजिक व स्वयंसेवी संस्था, उद्योजक तसेच जलसंधारण क्षेत्रात कार्यरत विविध घटकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. पदयात्रेत सहभागी नागरिकांना मृद व जलसंधारणाची शपथ देण्यात येणार आहे.
“चला, पाण्यासाठी एकत्र चालूया आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी जलसुरक्षित भविष्य घडवूया,” असे आवाहनही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. या पदयात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी सोबत दिलेला क्यूआर कोड क्लिक करून आपली नोंद करावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.