छत्रपती संभाजीनगरातील पीईएस इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांच्या वसतिगृहातील कॅन्टीनमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रकार समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पोह्यात आळी आणि भातात झुरळ आढळल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर दाखल झालेल्या तक्रारीची दखल घेत संबंधित कॅन्टीनचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.
राज्यात सुरू असलेल्या 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने कॅन्टीनची तपासणी केली. या पाहणीत कॅन्टीनमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आले. तसेच विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी वापरले जाणारे काही मसाले आणि इडली रवा मुदतबाह्य असल्याचे आढळले. हे साहित्य जागेवरच जप्त करून नष्ट करण्यात आले.
तपासणीदरम्यान काही खाद्यपदार्थांमध्ये नियमबाह्य पद्धतीने हानिकारक खाद्यरंगांचा वापर होत असल्याचाही संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधित कॅन्टीनचा परवाना निलंबित करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर अन्न सुरक्षा नियमांची अंमलबजावणी अधिक कडक करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कॅन्टीनविरोधातील ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. याचवेळी अंबरनाथ एमआयडीसी परिसरातील काही पॅकेज्ड पिण्याचे पाणी आणि शीतपेय उत्पादक कंपन्यांबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही कंपन्या टँकरद्वारे पाणी आणत असल्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणाचीही चौकशी सुरू असून, संबंधित नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याचा तपास प्रशासनाकडून केला जात आहे.
#topnewsmarathi #topnews #breakingnews #fda #tukarammundhe