मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) हा मराठी लोकप्रिय कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या काही वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. गेल्या नऊ वर्षांपासून हा कार्यक्रम महाराष्ट्राला खळखळून हसवत आहे. हा कार्यक्रम निरोप घेणार असल्याने चाहत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. हा कार्यक्रम कोणत्या कारणामुळे निरोप घेणार आहे ते कारणदेखील समोर आले आहे.
‘या’ कारणाने ‘चला हवा येऊ द्या’ घेणार प्रेक्षकांचा निरोप
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड 2014 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या कार्यक्रमाचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने या कार्यक्रमाचे चाहते मात्र नाराज झाले आहेत. एकीकडे टीआरपीच्या कारणाने हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झी मराठीवर एक नवा कार्यक्रम सुरू होणार आहे. या कार्यक्रमाला स्लॉट मिळत नसल्याने ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम काही दिवसांसाठी ब्रेक घेणार आहे. नवा कार्यक्रम संपल्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम पुन्हा एकदा महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज होणार आहे.
‘चला हवा येऊ द्या’ हा लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम (भालचंद्र कदम), सागर कारंडे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, स्नेहल शिदम हे सर्व विनोदवीर घराघरांत पोहोचले. या कलाकारांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठी प्रसिद्धी मिळाली. या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.