जालना : आजकाल शेती – संपत्तीच्या वादातून लोक आपली नाती विसरतात आणि एकमेकांच्या जीवावर उठतात. अशीच एक घटना जालनामध्ये (Jalna Crime) घडली आहे. यामध्ये शेतीच्या पाण्यावरून झालेल्या वादातून आरोपीने आपल्या चुलत भावाची हत्या केली आहे. जालना तालुक्यातील मौजपुरी या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. योगेश बाबुराव डोंगरे असे या घटनेत हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
काय घडले नेमके?
दोघा भावांमध्ये काल पाण्याच्या वाटणीवरून झालेला वाद गावकऱ्यांनी मध्यस्थी करत मिटवला होता. पण डोक्यात घुसलेला राग मात्र थंडावला नसल्याने रात्री उशिरा बाहेर गावी राहत असलेल्या चुलत भावाने मौजपुरी येथे येऊन तीन भावांच्या मदतीने योगेश डोंगरे यास बेदम मारहाण केली. या मारहाणीत योगेशचा मृत्यू झाला. एवढेच नाहीतर रागाने बेभान झालेल्या आरोपींनी कुठलाच विचार न करता योगेशसह त्याच्या पत्नीलाही मारहाण केली. या मारहाणीत योगेशची पत्नी शिल्पा गंभीर जखमी झाली आहे.
या मारहाणीची माहिती मिळताच पोलिसांना कळवताच परतुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत यांच्यासह स.पो.नि. मिथुन घुगे, उपनिरीक्षक राकेश नेटके यांनी आपल्या टीमसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर योगेशचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात पाठवण्यात आला. याप्रकरणी मृत योगेशचे वडील बाबासाहेब डोंगरे यांच्या फिर्यादीवरून शालीकराम उर्फ सावळाराम डोंगरे, पंडित डोंगरे, रामेश्वर डोंगरे, पवन टोम्पे, नानीबाई डोंगरे, कविता डोंगरे, आसाराम डोंगरे या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी 5 जणांना अटक करण्यात आली असून स.पो.नि. घुगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.