मुंबई : सप्टेंबर महिन्याची सुरुवात मुसळधार पावसानं (Maharashtra Rain) झाली. गणेशोत्सवामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. पावसाच्या आगमनाने आपला शेतकरीदेखील सुखावला आहे. हा पाऊस सध्या देशाच्या काही राज्यांमधून परतीची वाट धरताना दिसत आहे. असं असलं तरीही महाराष्ट्रात त्याचा मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागानंच राज्यातील परतीच्या पावसाची तारीख वाढल्याचे स्पष्ट केले आहे.
1 ऑक्टोबरपर्यंत राज्याच्या काही भागांमध्ये मध्यम तर, काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, त्यानंतर पुढील दोन दिवसांसाठी भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, गडचिरोली, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळेल. राज्याच्या उर्वरित भागांमध्ये मात्र पाऊस उघडीप देईल असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
तसेच मुंबईसह उपनगरांमधील काही भागांत पावसाच्या तुरळक सरींची अधूनमधून बरसात होईल. तर, अधूनमधून विजांच्या कडकडाटामुळं सोसाट्याचा वारा आणि ढगांचा गडगडाट असे चित्र शहरातील काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. पुढच्या किमान दहा दिवसांसाठी शहरात आणि शहराला लागून असणाऱ्या उपनगरीय क्षेत्रांमध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळणार आहे.