देशाचे माजी सॉलिसिटर जनरल आणि प्रसिद्ध वकील हरीश साळवे (Harish Salve) हे वयाच्या 68 व्या वर्षी तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढले आहेत. यापूर्वी 2020 मध्ये हरिश साळवे यांनी दुसऱ्यांदा आपली लग्नगाठ बांधली होती. दरम्यान, ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे केंद्र सरकारच्या नव्यानं स्थापन झालेल्या वन नेशन वन निवडणूक समितीचे सदस्यही आहेत.
हरीश साळवे यांनी नुकतंच त्रिना यांच्यासोबत थाटामाटात लग्न केलं आहे. त्रिना मुळची ब्रिटनची आहे. यापूर्वी, मीनाक्षी (पहिली पत्नी) आणि कॅरोलिन ब्रॉसार्ड (2020) यांच्याशी त्यांनी विवाह केला होता. साळवे आणि त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी मीनाक्षी यांनी 38 वर्षांच्या सुखी संसारानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. जून 2020 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला असून दोघांना साक्षी आणि सानिया या दोन मुली आहेत. त्यांच्या लग्नाला आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी, उद्योजक निता अंबानी आणि उद्योजक लक्ष्मी मित्तल हे देखील उपस्थित होते.
हरीश साळवे हे प्रख्यात वकील आहे. त्यांच्या फी चा आकडा पाहून अनेकांचे डोळे विस्फारतात. त्यांचे वडील एनकेपी साळवे हे विदर्भातले काँग्रेसचे बडे नेते होते. विदर्भवादी नेते म्हणून त्यांची ओळख होती. पण वडिलांप्रमाणे त्यांनी राजकारणात जाण्याचा मार्ग निवडला नाही. अनेकदा त्यांच्यावर टीकाही झाली. त्यांचे काही गाजलेले खटले पाहुयात….
1) 1992 मध्ये ते दिल्ली उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी टाटा, महिंद्रा आणि अंबानी यांसारख्या मोठ्या घराण्यांची वकिली केली.
2) केजी बेसिन प्रकरणात जेव्हा अंबानी बंधुंमध्ये वितुष्ट निर्माण झालं तेव्हा मुकेश अंबानी यांचा पक्ष हरीश साळवे यांनी मांडला.
3) भोपाळ वायुगळती प्रकरणात युनियन कार्बाईड प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा केशव महिंद्रा यांच्यातर्फे त्यांनी युक्तिवाद केला.
4) व्होडाफोनने 14200 कोटी रुपयांचा कर कथितरित्या चुकवल्याचं प्रकरण गाजलं होतं. त्यात साळवेंनी व्होडाफोनला विजय मिळवून दिला होता.
5) केरळ मध्ये दोन मच्छीमारांच्या हत्येप्रकरणी साळवेंनी इटलीच्या दुतावासाची बाजू मांडली होती. मात्र जेव्हा इटली सरकारने या मच्छीमांरांना भारताकडे सोपवण्यास नकार दिला तेव्हा साळवेंनी या खटल्यातून फारकत घेतली.
6) बिल्किस बानो खटल्यातील त्यांचा विजय हाही उल्लेखनीय समजला जातो.
7) पाकिस्तानने पकडलेल्या कुलभूषण जाधव यांची बाजू साळवे यांनी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात हिरारीने मांडली. माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या विनंतीवरून त्यांनी कुलभूषण जाधव यांचा खटला लढण्यासाठी केवळ 1 रुपया शुल्क घेतले होते.
8) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांची बाजू सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी मांडली होती.
हरीश साळवे फी म्हणून प्रत्येक तासाला काही लाख रुपये तर एका दिवसासाठी 25 ते 30 लाख रूपये घेतात. कायद्याचा काथ्याकुट करण्यात साळवे हे तरबेज मानण्यात येतात. त्यांची फी, लढलेल्या केसेस या बरोबरच त्यांच्या वैवाहिक जीवनामुळे हरीश साळवे कायमच चर्चेत असतात.