अमरावती : तलाठी भरती परीक्षेत सावळा गोंधळ सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्व्हर डाऊन असल्यानं परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राबाहेर ताटकळत उभं राहावं लागत आहे. परीक्षेला देखील विलंब झाला आहे. दरम्यान सुरू असलेल्या या सर्व प्रकारावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात 30 ऑगस्टला ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.
काय म्हणाले बच्चू कडू ?
तलाठी भरती परीक्षेत सावळा गोंधळ सुरू आहे. विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावर प्रतिक्रिया देताना आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्व परीक्षा या प्रामाणिकपने व्हाव्यात, गोंधळ करणाऱ्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे, नाही तर सरकार विरोधात उभं राहू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. 6 महिन्यांच्या कालावधीनंतर सर्व परीक्षा या केरळच्या धर्तीवर केवळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फतच घेण्यात याव्यात. तसेच वर्षभरात ज्या काही स्पर्धा परीक्षा होतील त्या सर्व परीक्षांसाठी मिळून विद्यार्थ्यांकडून केवळ एक हजार इतकेच परीक्षा शुल्क आकारण्यात यावे अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.