मुंबई- भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा कोर्लई गावातील 19 बंगल्यांच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. आज सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत थेट शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांना पाठवलेले आणि रश्मी ठाकरे यांनी कोर्लईच्या सरपंचाला लिहिलेले पत्रच वाचून दाखवले.
संजय राऊत यांनी 11 ऑक्टोबर 2021 रोजी किरीट सोमय्या यांना पत्र पाठवलं होतं. त्या पत्रामध्ये संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्याचे दिसून येते. संजय राऊत या पत्रामध्ये म्हणतात की, प्रिय श्री किरीट सोमय्याजी, जय महाराष्ट्र. भ्रष्टाचार आणि शासकीय पैशाचा अपहार आदी अनेक प्रकरणे आपण उघड केले. हे राष्ट्रावर उपकार झाले. त्यामुळे अनेकांना तुरुंगात जावं लागले. भ्रष्टाचार विरोधातील आपल्या लढ्याला बळ मिळावं, असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी कोर्लई गावच्या सरपंचांना पाठवलेल्या पत्राचंही वाचन सोमय्या यांनी यावेळी केलं. 23 मे 2019 आणि 2 फेब्रुवारी 2019 रोजी रश्मी ठाकरेंनी कोर्लईच्या सरपंचांना पत्र लिहिलं होतं. एका पत्रामध्ये रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी म्हटलंय की ‘आम्ही 30 एप्रिल 2014 रोजी जमीन मालक अन्वय मधुकर नाईक यांच्या जागा खरेदी केल्या असून यातील असेसटमेंट क्रमांक 787 ते 779 आणि 801 ते 805 हे घर आमच्या नावे केल्यास मी आपले ऋणी राहणार’ त्यावर सरपंचाची रिसीव्ह म्हणून सही आहे. मी हे पत्रं ग्रामपंचायतीतूनच नाही तर चारही ठिकाणी आरटीआयमधून मी माहिती मिळवली आहे, असं त्यांनी सांगितलं.
2 फेब्रुवारी 2019 रोजी पाठवलेल्या दुसऱ्या पत्रात रश्मी ठाकरे म्हणतात की, ‘ही मिळकत आम्ही अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी विक्री खताद्वारे विकत घेतली आहे. आम्ही मिळकत खरेदी केली तेव्हा कोणतेही बंगले अथवा घरे नव्हती’ त्यामुळे फोर्जरी कोण करतंय? आणि चिटींग कोण करतंय? असा सवाल सोमय्या यांनी राऊत यांना केला आहे. उद्धव ठाकरे यांना पत्नीची बाजू घ्यायची नाही काय? मुख्यमंत्री यावर काहीच बोलत नाहीत. ते जनतेची फसवणूक करत आहेत, असा हल्लाबोल किरीट सोमय्या यांनी केला.