नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना पुन्हा एकदा धमकीचा (Threat) फोन आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सोमवारी (15 मे) गडकरी यांच्या कार्यालयात फोनवरून ही धमकी देण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. विशेष बाब म्हणजे यापूर्वी देखील याआधी देखील नितीन गडकरी यांना दोनवेळा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
नितीन गडकरी यांना त्यांच्या नागपूरमधील (Nagpur) कार्यालयात पहिला धमकीचा फोन आला होता. जयेश पुजारी (Jayesh Pujari) नावाच्या व्यक्तीने हा कॉल केला होता. त्यावेळी त्याने 100 कोटी रुपयांची खंडणी (Extortion0 मागितली होती. यानंतर 21 मार्च रोजी दुसऱ्यांदा नितीन गडकरी यांना धमकीचा फोन आला. यावेळी फोनवरून 10 कोटी रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली होती.
याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून नितीन गडकरींना धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा याला काही दिवसांपूर्वी बेळगावमध्ये अटक केली होती. त्यानंतर त्याचा ताबा घेण्यासाठी नागपूर पोलिसांची एक टीम बेळगावला (Belgaon) गेली होती. त्यानंतर त्याची रवानगी नागपूर येथील तुरूंगात करण्यात आली. धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर आता पुन्हा धमकी आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.