पुणे : काल पुण्यातील खडकवासला धरण (Khadakwasla Dam) परिसरात 9 मुली पोहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी 7 मुली पाण्यात बुडाल्याची घटना घडली होती. यापैकी 5 जणींना वाचवण्यात यश आले तर दोन मुलींचा पाण्यात बुडून (drowning) मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना घडली तेव्हा गोऱ्हे खुर्द येथील 53 वर्षीय संजय सीताराम माताळे यांनी या पाच मुलींचा जीव वाचवण्याची कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
या सगळ्या प्रकरणाबद्दल संजय सीताराम माताळे (Sanjay Sitaram Matale) यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, घटनेच्या दिवशी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास स्मशानभूमीत सावडण्याचा विधी सुरू होता. त्यावेळी अचानक काही मुलींचा आरडाओरड ऐकण्यास मिळाला. त्यानंतर आम्ही सर्वजण धरणाच्या भिंतीजवळ गेलो असताना काही मुली बुडत असल्याचे दिसून आले.
यानंतर त्यांनी तातडीने धावत जाऊन पाण्यात उडी मारली. तोपर्यंत मुलींच्या नाका तोंडामध्ये पाणी गेल्याने त्या बेशुद्ध पडल्या होत्या. त्यामुळे बाहेर काढणं कठीण झाले होते. पण एक एक करून पाच मुलींना काढून त्यांना सर्व मुलींना तात्काळ रूग्णालयात दाखल केले. मात्र दुसऱ्या दोन जणींना वाचवण्यात त्यांना अपयश आले अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.