जालना : देशभरात लम्पी आजारानं थैमान घातलेलं असताना लम्पी आजाराच्या संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्तानं पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेले हे पत्र सध्या चर्चेत आहे. शेतकऱ्यानं नेमकी काय व्यथा मांडली आहे पाहूया.
जालना जिल्ह्यातील कृष्णा एकनाथ खरात या शेतकऱ्याने लम्पी आजाराविषयी मुख्यमंत्र्यांना रक्तानं पत्र लिहिलं आहे. कृष्णा एकनाथ खरात असं या शेतकऱ्याचं नाव असून जालना जिल्ह्यातील रोषणगाव येथील रहिवासी आहे. रोषणगाव परिसरात लम्पी आजारामुळे १६ जनावरं दगावली आहेत. तसच दोनशेपेक्षा जास्त जनावरांना लम्पी आजारानं ग्रासलं आहे.
मात्र, एक महिन्यापासून ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी गैरहजर असल्याची माहिती शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्यामुळं ग्रामसेवक संघटनांनी शिक्क्यावर बहिष्कार टाकला आणि शेतकरी अडचणीत सापडला. याच कारणास्तव ग्रामसेवक आणि गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना थेट रक्तानं पत्र लिहिलं.
जनावरांना होणाऱ्या लम्पी आजारामुळे राज्यभरातील शेतकरी हवालदिल झालेत. त्यामुळं शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेकडे स्थानिक प्रशासन, राज्य सरकारन कधी लक्ष देणार हाच प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांतून उपस्थित केला जातोय.