महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून सुरू असलेला बेळगाव, कारवार, निपाणी हा कर्नाटकातील मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात सामील करण्यासाठी अनेक वर्षांचा लढा सुरू आहे. तर 2004 मध्ये हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले . या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तब्बल पाच वर्षांनी होणाऱ्या सुनावणीकडे समस्त सीमाभागातील मराठी भाषिकांचे लक्ष लागलं आहे.
काय आहे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद ?
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील सीमाप्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. 17 जानेवारी 1956 मध्ये रोजी बेळगाव, कारवार, बिदरसारखी मराठी गावे तत्कालिन म्हैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आली होती. बेळगाव जिल्ह्यात मराठी भाषिकांचं प्राबल्य असतानाही महाराष्ट्रापासून तोडल्यामुळे इथल्या जनतेच्या भावना तीव्र आहेत. गेल्या 50 वर्षापासून बेळगावची जनता महाराष्ट्रात सामील होण्यासाठी संघर्ष करत आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांवर त्यावेळी झालेला अन्याय दूर करण्यासाठी लढा सुरु केला होता, तो अद्यापही कायम आहे.