पुणे- माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही असा महत्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
येत्या २० जून रोजी विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी काही तास विधानभवनात जाऊ देण्याची परवानगी मागितली होती. मात्र न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळली आहे.
यापूर्वी देखील राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी मुंबई सत्र न्यायालयाने नाकारली होती. त्यामुळे महाविकास आघाडीची दोन मते कमी झाली होती.
विधान परिषद निवडणुकीमध्ये आमदारांचे संख्याबळ पाहता भाजप आणि काँग्रेसमध्ये आमदार निवडून आणण्याची लढत पाहायला मिळत आहे. भाजपला पाचवा उमेदवार निवडून आणण्याकरिता 22 मतांची आवश्यकता आहे तर काँग्रेसला 10 मताची आवश्यकता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार त्यांच्याकडे असलेल्या उपलब्ध आमदारांच्या संख्येनुसार सहज निवडून येणार आहेत.
राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकासआघाडीचा झालेला पराभव पाहता महाविकास आघाडीकडून सावध पवित्रा घेण्यात आला असून भाजपचा उमेदवार टाळण्याकरिता रणनिती आखण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये उमेदवार विजयी होण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी दोघांनाही अपक्ष आमदारांची मदत लागणार आहे. त्यामुळे आता घोडेबाजार होणार हे स्पष्ट आहे.
विधानसभेत 13 अपक्ष आमदार तर छोट्या पक्षांचे 16 आमदार आहेत. राष्ट्रवादीचे 53 आमदार असून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. विधानसभेत शिवसेनेचे 56 आमदार होते. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे दुबईत नुकतेच निधन झाल्याने शिवसेनेच्या आमदारांची संख्या 54 वर आली आहे.विधानसभेत काँग्रेसचे 44 आमदार आहेत.